(२००९ ची नोट पुन्हा टाकतो आहे – कारण सरकार बदलले तरी विचार बदलेलच असे नाही! )
भर समुद्रात शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा !! म्हणजे statue of liberty सारखे आपले शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध होणार, विलासराव आणि आबांचा हुकूमच आहे तसा … दोघांनी स्वतः होडीमधून समुद्रात पाहणी करून जागा सुद्धा नक्की केली आहें
३०० फूट उंच प्रतिमा समुद्रात बांधायाची म्हणजे अग्निदिव्यच, त्यासाठी कोटयावधी रुपये खर्चही स्वाभाविकच आहे, पण महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारायाचे असेल तर खर्चाची पर्वा तरी कशाला करायची ?
प्रगत आणि प्रगल्भ महाराष्ट्र राज्याकरता हे स्मारक उभे राहणे, ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. हा मराठी मनाचा मानबिंदू आहे … हा हिंदू अस्मितेचा प्रश्न आहे … अशा उदात्त ध्येयांसमोर सरकारी निधीचा योग्य वापर, सामान्य माणसाचे प्रश्न, पर्यावरणावर होणारे प्रकल्पाचे परिणाम वगैरे गौण मुद्दे आहेत …. तेव्हा रयतेने समुद्रात भव्य शिवप्रतिमा व्हावी ही तो श्रींची इच्छा असे मानावे आणि मूग गिळून गप्प बसावे … वाटल्यास २००९ च्या विधान सभा निवडणूकीत, या प्रकल्पाचे गाजर दाखविल्याबद्दल सत्ताधारी पक्षास मतेही द्यावीत.
या महान आणि अचाट कल्पनेला विरोध करणारे लोक हिंदू द्वेष्टे आणि महाराष्ट्र द्रोही मानण्यात येतील। ज्याप्रमाणे statue of liberty चा पुतळा पाहण्यास पर्यटक गर्दी करतात तसेच शिवरायांचे दर्शन घ्यायला जगाच्या पाठीवर असलेल्या सर्व देशांचे पर्यटक गर्दी करतील आणि पुतळा पाहाताच त्याना छत्रपतींच्या थोरवीचा साक्षात्कार होईल
असो ॥ तथाकथित शिव-भक्तांच्या या फर्मानाचा विरोध करणे म्हणजे त्यांचा संताप आणि चिखलफेक यांना आमंत्रण देण्यासारखे आहे … कारण महाराष्ट्रात बरेच लोक शिवाजी महाराजांना आपल्याच मालकीची सनद समजू लागले आहेत .. त्यामुळे महाराजांच्या नावावर कोणीही काहीही करो त्याबद्दल अवाक्षरही काढायचे नाही।
तरीदेखील ॥ रयतेचा जाणता राजा अशी ख्याती असलेले आपले महाराज .. त्यानी कोणत्याही किल्ल्याला किंवा शहराला स्वतः चे नाव दिलेले नाही .. खुद्द रायगडावरदेखील फक्त … ‘सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर’ या शब्दांत महाराजांच्या वास्तुरचानाकाराची दखल घेतली गेली आहे … प्रजेच्या अपेक्षा आकांक्षा अपूर्ण असताना स्वतः चा पुतळा बनाविण्यावर वारेमाप खर्च महाराजांना तरी मान्य झाला असता का ? विमानतळ, रेलवे स्थानक आणि वस्तुसंग्रहालायास महाराजांचे नाव असताना अजून एक स्मारक बनवणे हास्यास्पद आणि महाराजांच्या कीर्तीचे अवमूल्यन करणारे ठरेल हे आपल्याला समजत का नाही ?
स्मारकाला विरोध म्हणजे म्हणे मराठी मनाच्या भावनांचा अनादर आहे ॥ मग शिवरायांच्या नावावर मतपेटीचे राजकारण खेळणारे आणि महाराज नक्की कोणत्या जातीचे होते असल्या वायफळ मुद्द्यावरुन तोड़फोड़ करणारे कसे आपल्याला चालतात ? शिवाजीराजे कोण होते हे अख्ख्या जगाला कळलेच पाहिजे … आणि त्यावर १०० काय २०० कोटी खर्च झाले तरी हरकत नाही ॥ पण त्यासाठी समुद्रात ३०० फूटी पुतळा उभारायाची आवश्यकता नाही ,,,, अर्थात केवळ विरोध न करता विधायक पर्याय ही सुचवले पाहिजेत … आणि असे कित्येक पर्याय सहज उपलब्ध आहेत
शेतांची नासधूस होणार नाही अशा प्रकारे प्रवास करा अशी आज्ञा आपल्या घोड़दळाला देणारे आणि गरजे इतकेच सुकलेले लाकूड वापरून पर्यावरणाची काळजी घ्या अशी ताकीद आपल्या सैनिकाना देणारे आपले महाराज … त्यांची पूजा करत असताना त्यांचीच तत्त्व धाब्यावर बसवून चालेल का ?
महाराष्ट्रात ३५० किल्ले आहेत आणि रायगडासकट सर्व किल्ल्यांची परिस्थिति बिकट आहे … त्यांचा पर्यटन केन्द्रांच्या रूपात विकास व्हायला हवा … adventure tourism चा ज़माना आहे … महागड्या तारांकित बोटीत बसून पुतळा पाहिल्याने महाराज कळणार नाहीत … त्यासाठी मुसळ्धार पावसात ढगांच्या दुलईत लपलेला रायगड शोधावा लागेल …. किल्ल्यांचे सैनिकी महत्त्व रायगडाच्या १४०० पायय्रा चढून दमछाक झाल्या शिवाय समजणार नाही … खरे ना ?
शिवरायांचा प्रताप, त्यांचा साक्षेप, दूरदृष्टी, त्यांचा न्यायीपणा, युद्धान्मधील त्यांचे डावपेच .. असे कित्येक महत्त्वाचे पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वात आहेत … त्यांना पुतळा न्याय देऊ शकणार आहे का …. त्यापेक्षा ५०-६० कोटी रुपये खर्चात महाराजांवर अनेक भाषांत उत्कृष्ट चित्रपट तयार केला गेला पाहिजे … तरच महाराजांचा महिमा महाराष्ट्राच्या सीमे पलीकडे पोचेल …
Hi nicee reading your post