सचिन खेडेकर आणि चिन्मयी सुमीत आई-बाबा म्हणून … अमेय वाघ पंचविशीच्या आसपासचा मुलगा आणि मिथिला पालकरचे पदार्पण होणारी सून म्हणून … हे कास्टिंगच इतकं आवडलं की चित्रपट पाहायचा हे तेव्हाच ठरवलं होतं … मुरांबा ही म्हणाल तर एका मुलाची गोष्ट आहे … म्हणाल तर कुटुंबाची आणि म्हणाल तर आजच्या वडील-मुलगा नात्याची! आणि ही एक टिपिकल गोष्ट नाही त्यामुळे हा एक रिफ्रेशिंग सिनेमा असेल अशी अपेक्षा ट्रेलर आणि इंटरनेटवरील प्रमोशन पाहून झाली …
ही एका प्रेमाची गोष्ट तर आहेच … पण त्या प्रेमावर सध्या एका वादळाचे सावट आहे … म्हणजे ही एका ब्रेकपची गोष्ट आहे … एका सुखवस्तू कुटुंबातला एकुलता एक मुलगा … आई-वडीलांनी दिलेलं स्वातंत्र्य आणि वडीलांचा मित्र म्हणून संवाद साधण्याचा प्रयत्न पहिल्या भागातच आपल्यापर्यंत पोहोचतो … धारवाडला फक्त दहावीपर्यंत शिकलेली आई आणि तिच्या जुन्या धारणा … पण तरीही आपल्या मुलाच्या गर्लफ्रेंड या नात्याला तिने मनापासून स्वीकारलं आहे … आलोकची गर्लफ्रेंड इंदू म्हणजे इंद्रायणी आता देशमुख कुटुंबाची सदस्य आहे … आणि मग अचानक आलोकचं ब्रेकअपबद्दल सांगणं … ते ऐकून आईचं भांबावून जाणं … वडीलांची भूमिका न घेता मित्र म्हणून नक्की काय घडलं आहे हे समजून घेण्याचा बाबांचा प्रयत्न या कथानकात हा चित्रपट मुरत जातो.
सचिन खेडेकरचा अभिनय फारच छान … बापाची उदाहरणे टिपिकल असतात असं आलोक म्हणतो … त्यालाही हा बाप खिलाडूपणे घेतो … इथं संवाद जरा टिपिकल झालेत हे मात्र खटकते … पण मुलाच्या बाबतीत एवढा सजग आणि समजून घेणारा बाप … त्याच्या कामाचं मार्गी लागत नाही … तो कुठंही टिकत नाही ही गोष्ट फारशी गांभीर्याने घेत नाही हेही विसंगत वाटतं कारण त्यासाठी त्याने पुढे केलेलं कारण फारच तकलादू आहे. ब्रेकअप नंतर आलोक आणि इंदूला इच्छेविरुद्ध जेवायला नेऊन बोलायला लावणं आणि त्यावेळी झालेले टिपिकल विनोद यातही चित्रपट मंदावतो … चिन्मयी सुमीत ही खमकी, स्वतंत्र मत आणि भूमिका असलेली आई असली पाहिजे … तिला असं गावंढळ केलेलं… थोडी बिचारी केलेलं आवडलं नाही … तरीही हे दोन्ही कलाकार त्यांना जे पात्र साकारायचं आहे ते छान साकारतात … त्यांचा अभिनयच आपल्याला त्यांच्याशी जोडतो …
आलोकची भूमिका अमेय वाघने छान साकारली आहे फक्त काही ठिकाणी त्यातला कैवल्य जागा होतो … मिथिला पालकर एकदम फ्रेश चेहरा म्हणून समोर येतो … इंदू … तिचं तिच्या कामावरचं प्रेम … आपल्या जोडीदाराने त्याच्या क्षमतेला साजेसा पल्ला गाठावा … अल्पसंतुष्ट राहू नये … आपला कम्फर्ट झोन सोडावा हे तिला मनापासून वाटतं … पण ती पेचात सापडते कारण काही कटू गोष्टी तिला आलोकला त्याच्या भल्यासाठी सांगाव्या लागतात … ही घालमेलही मिथिला उत्तम प्रकारे उभी करते.
दिगदर्शनात वैभव नार्वेकरचा स्तुत्य प्रयत्न …. हृषीकेश सौरभ जसराजचं संगीत वेगळ्या धाटणीचं आणि कथेला ताकद देणारं … मिलिंद जोगचं छायाचित्रण तांत्रिक दृष्टीने चांगलं पण काही वेगळे रंग, दृश्य भाषा समोर न आणणारं … संवाद नक्कीच अजून चांगले लिहीता आले असते …
आलोक आणि इंदू परत एकत्र येणार का?या ब्रेकअपच्या मुळाशी कोणते मनोव्यापार आहेत हे चित्रपटाच्या शेवटी उलटगडत जाते … दोन तास आठ मिनिटांचा हा चित्रपट करमणूक करतो आणि एकदा हा मुरांबा चाखून पाहायलाच पाहिजे सचिन-चिन्मयी-अमेय आणि मिथिला साठी …
एक गोष्ट मात्र मला नेहमी जाणवते व बाहुबली पाहिल्यानंतर जेव्हा चि व चि सौ का पाहिला आणि आता मुरांबा पाहिला तेव्हा पुन्हा अजूनच प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे मराठी सिनेमा फारच टीव्ही नाटकाच्या अंगाने जातोय अजूनही … हे दृश्य अनुभवाचे माध्यम आहे … संवादाचे नव्हे … चित्रांच्या भाषेच्या शब्दसंपदेनेच तो सजवायला हवा. सिनेमा हा एक दृश्य अविष्कार आहे हे विसरून चालणार नाही …
Thanks for writing this… काही मुद्द्यांबाबत मतभिन्नता असू शकते आपल्यात. पण आवर्जून दखल घेऊन प्रतिक्रिया लिहिली हे फार मोलाचं आहे माझ्यासाठी. धन्यवाद इतक्या सविस्तर रसग्रहणासाठी.
Getting to see you on screen is always pleasure! Manasi and I look forward to it! See you soon